शेतकरी कर्जमाफी लवकरच ; विधानसभेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
विधानसभेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा ; राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जून २०२६ पूर्वीच केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून, आता ही कर्जमाफी लवकरच मार्गी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. या अधिवेशनात कर्जमाफीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले गेले होते, तसेच जुन्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर आणि सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर सरकारला धारेवर धरण्यात आले होते.
कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी २००९, २०१७ आणि २०२० मध्ये कर्जमाफी करूनही शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत अडकत असल्याचे नमूद केले. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
ही समिती सध्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करत आहे, जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांच्या नियोजन आणि परिस्थितीत सुधारणा होईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीचा फायदा हा कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यालाच झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये.
या उच्चस्तरीय समितीचा अहवाल एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल. या अहवालानंतर शासन कर्जमाफी कशाप्रकारे करायची, तसेच कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील, याबद्दलची सविस्तर माहिती जाहीर करेल. शेतकऱ्यांची असलेली थकीत कर्जाची कर्जमाफी ही या उपाययोजनांचा एक भाग असणार आहे आणि ती ३० जून २०२६ पूर्वीच केली जाईल.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह, २०१९ पासून थकीत असलेले शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासन दिले आहे की, १ जुलै २०२६ पर्यंत कर्जमाफीच्या योजनेसंबंधित सर्व घोषणा त्या ठिकाणी केल्या जातील.